३१ मेपर्यंतच खोदकाम; जूनपर्यंत मुदतवाढ तीन वेळा मुदतवाढ मिळालेला राणीचा रत्नहार म्हणून ओळखला जाणारा मरिन ड्राइव्हचा रस्ता पावसाळ्याआधी पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मात्र रस्त्याचे उर्वरित काम पाहता पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण न झाल्यास किमान हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण खुला ठेवला जाईल. अडीच वर्षांपूर्वी, ३१ जानेवारी २०१४ रोजी मरिन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाष रस्त्याचे नूतनीकरण सुरू झाले. सुमारे ७५ वर्षांपूर्वी, १९४० मध्ये या रस्त्याचे काम झाले होते. मात्र गेल्या ७५ वर्षांत रात्रंदिवस वर्दळ राहिलेल्या या सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या. या रस्त्यावर मॅकेनाइज मॅस्टीक अस्फाल्ट या चकचकीत डांबराचा थर देण्याची शिफारस पालिकेने नियुक्त केलेल्या समितीने केली. त्यानुसार गिरगाव चौपाटी ते मादाम काम रोडपर्यंतच्या रस्त्याच्या ७० टक्के भागावर डांबरीकरण व मादाम कामा रोड ते एनसीपीए या ५०० मीटरच्या पट्टय़ात सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे निश्चित झाले. यासाठी आरपीएस या वादग्रस्त कंपनीला ६५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. हे काम गेल्यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मुंबईत आजमितीला ८४ रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यात हा रस्ता प्रमुख आहे. गेल्या दोन पावसाळ्यांतही या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे किमान या पावसाळ्याआधी हा रस्ता पूर्ण तयार होणे गरजेचे आहे, असे पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र रस्त्याचे उर्वरित काम व मान्सूनपूर्व पावसाच्या सरी यामुळे हे काम पूर्ण होण्याबाबत काही अधिकाऱ्यांना शंका वाटते. आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार ३१ मे नंतर रस्त्याचे खोदकाम थांबवले जाणार आहे. त्यानंतर पावसाची सुरुवात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवला जाईल व उर्वरित काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाईल, असे पालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तीन वेळा मुदतवाढ अनेक कारणांनी मरिन ड्राइव्ह रस्त्याच्या कामात अडथळे येत गेले. व्हीआयपी रहदारी, रस्त्याखालून जाणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अशा अडथळ्यांमुळे या कामाची मुदत आतापर्यंत तीनवेळा वाढवण्यात आली. त्यामुळे या रस्त्याला आता जूनपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आता मात्र या रस्त्याचे काम वेगात पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.