दरवर्षी तोटा होत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची सूचना नेरळ-माथेरान मार्गावर ब्रिटिश काळापासून सुरू असलेली ‘मिनी ट्रेन’ सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रिबदू आहे. मात्र दरवर्षीच्या तोटय़ामुळे रेल्वे प्रशासन कंटाळले आहे. त्यामुळे एक तर ती गाडी बंद करावी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ती चालवावी, अशी सूचना काही रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे. मुख्यत्वे ही गाडी पर्यटनासाठी उपयुक्त असल्याने महामंडळाने ती चालविल्यास त्यासाठी इतर मदत रेल्वे करेल, असा मनोदयही काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. माथेरानची गाडी गेल्या आठवडय़ात अमन लॉज स्थानकाजवळ रूळांवरून घसरली. या अपघातात कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणी एका अभियंत्याला रेल्वेने निलंबित केले. मात्र, दरवर्षी २० कोटी रुपयांचा तोटा देणारी ही गाडी कशासाठी चालवायची, असा प्रश्न मध्य रेल्वेतील काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत बेस्टने तोटय़ातील अनेक मार्ग बंद केले, तसाच हा तोटय़ातला मार्ग रेल्वेने बंद करण्याची गरज आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. ही गाडी मुख्यत्वे पर्यटनासाठी चालवली जात असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गाडीची जबाबदारी घ्यावी व आर्थिक भार उचलावा. त्यासाठी इतर मदत रेल्वे करेल, अशी काही रेल्वे अधिकाऱ्यांची इच्छा आहे. नेरळ-माथेरान हा मार्ग छोटय़ा गाडीसाठी आहे. त्याची डागडुजी करण्यासाठी जास्त खर्च होतो. मात्र त्या प्रमाणात उत्पन्न खूपच कमी असून दरवर्षी रेल्वेला २० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात यावा, असे मत मध्य रेल्वेचे काही अधिकारी व्यक्त करत आहेत. माथेरानच्या गाडीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसला, तरी भविष्यात काही तरी निर्णय घेण्याची वेळ रेल्वेवर येऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.