बॉलीवूडमध्ये अभिनयाने पडदा व्यापून टाकणाऱ्या अभिनेता शाहरुख खानबाबतचे प्रेम भारतीय क्रिकेटमध्येही कमी नसल्याचे दिसते. त्यामुळे त्याच्यावरील बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निर्णयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले. गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्यामुळे शाहरुखवर वानखेडे स्टेडियममध्ये येण्यास पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण कोणतेही ठोस कारण नसताना एमसीएने ही बंदी तीन वर्षांतच उठवली आहे.

बंदी उठवण्यासाठी शाहरुखने एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली होती, असे सूत्रांनी सांगितले. पण या निर्णयामध्ये फक्त एमसीएचे अधिकारी नसून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) मंडळीही असल्याचे दिसून येते.

एन. श्रीनिवासन ‘बीसीसीआय’मधून बाहेर पडल्यावर हळूहळू स्थिती बदलत गेली. शाहरुखवर बंदी घालण्याचा निर्णय एमसीएने विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेतला होता. त्यावेळी आयपीएलचे आयुक्त आणि काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनी जोरदार विरोध केला होता. बीसीसीआयचे सचिव आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर हेदेखील शाहरुखच्या पाठीशी असल्याचे समजते. आयपीएलमध्ये शाहरुखचा संघ कोलकाता नाइट रायडर्स आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष जगमोहन दालमियादेखील कोलकाताचे आहेत. त्यामुळे श्रीनिवासन बीसीसीआयमधून बाहेर पडल्यावर या साऱ्या धुरिणांसाठी मार्ग मोकळा झाला होता. फक्त शरद पवार यांना हे कोण सांगणार, हाच मुद्दा असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण शाहरुखनेच त्यांना विनंती केल्यामुळे तो प्रश्नदेखील सुटला. हा प्रस्ताव मांडण्यासाठी भाजपचे आमदार आणि एमसीएचे उपाध्यक्ष आशीष शेलार पुढे सरसावले आणि शाहरुखसाठी वानखेडेचे दार उघडले गेले.

 

शरद पवार यांच्या मान्यतेने आम्ही शाहरुखवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव मी कार्यकारिणी समितीपुढे  ठेवला होता आणि त्यांनीही तो मान्य केला.

– आशीष शेलार,

उपाध्यक्ष एमसीए