उपनगरी रेल्वे मार्गाच्या अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी, २४ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा तर मध्य आणि हार्बर रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मरीन लाइन्स ते माहीम जंक्शन दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे या काळात विरारच्या दिशेने जाणारी सर्व धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली असून गाडय़ा महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड या स्थानकांवर थांबणार नाहीत. १२ डब्यांच्या गाडय़ा लोअर परळ आणि माहीम जंक्शन येथे दोन वेळा थांबतील, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण दरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या काळात ब्लॉक करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण या दरम्यान सर्व वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस-मानखुर्द आणि ठाणे-पनवेल दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. या काळात या मार्गावरील प्रवाशांना मेन लाइनने व ट्रान्स हार्बरने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.