सहावीच्या धडय़ातून विद्यार्थ्यांना मेट्रोची माहिती देणार; मेट्रोच्या चालक रूपाली चव्हाण यांच्या मुलाखतीचाही समावेश शालेय विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींची ओळख करून देण्याच्या उद्देशाने शिक्षणप्रक्रियेत बदल होत असताना आता पुस्तकातील धडेही बदलले आहेत. आता पुढील वर्षी इयत्ता सहावीच्या मुलांच्या ‘बालभारती’च्या पाठय़पुस्तकात मुंबईच्या मेट्रोची ओळख करून देणारा एक धडाच समाविष्ट करण्यात आला आहे. ‘सफर मेट्रोची’ असे शीर्षक असलेल्या या धडय़ात मेट्रोची वैशिष्टय़े, मेट्रोची माहिती यांच्याबरोबरच पहिली मेट्रो चालवणाऱ्या महिला चालक रूपाली चव्हाण यांची मुलाखतही आहे. या धडय़ामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. मुंबईची पहिलीवहिली मेट्रो वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ८ जून २०१४ रोजी सुरू झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये या मेट्रोद्वारे तीन कोटी लोकांनी प्रवास केला आहे. आरामदायक, वातानुकुलित आणि वेगवान सेवेमुळे मुंबईकरांच्या पसंतीला उतरलेल्या मुंबई मेट्रोवनच्या प्रवासी संख्येत दर दिवशी वाढही होत आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नागपूर आदी शहरांमध्येही मेट्रोचे प्रस्ताव असले, तरी नजीकच्या भविष्यात तेथे मेट्रो सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे मुंबईच्या मेट्रोबद्दल महाराष्ट्राच्या गावांमध्येही आकर्षण आहे. नेमके हेच आकर्षण आणि लहानग्यांना वाटणारे कुतुहल शमवण्यासाठी पुढील वर्षीच्या बालभारती या क्रमिक पाठय़पुस्तकात इयत्ता सहावीसाठी ‘सफर मेट्रोची’ हा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. या धडय़ातून मेट्रोची साधारण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. विशेष म्हणजे या धडय़ात सरकते जिने, स्वयंचलित दरवाजे, तिकिटांऐवजी टोकनची व्यवस्था, वातानुकुलित प्रवास आदी मेट्रोच्या सर्व वैशिष्टय़ांची माहिती देण्यात आली आहे. मेट्रोचा परिचय अधिक चांगल्या प्रकारे व्हावा, यासाठी या धडय़ाबरोबरच मेट्रोच्या पहिल्या फेरीचे सारथ्य केलेल्या रूपाली चव्हाण यांची छोटेखानी मुलाखतही छापली आहे. या मुलाखतीद्वारे मेट्रोच्या परिचालनाविषयी तसेच मेट्रोच्या वेगळेपणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे.