कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला भारतात यायचे आहे. त्याची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारशी सेटलमेंट सुरू आहे, अशी ‘गुप्त’ माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उघड केली. दाऊदला भारतात आणल्याचे श्रेय या सरकारला घ्यायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी आज फेसबुकवर धमाकेदार ‘एन्ट्री’ करतानाच बुलेट ट्रेन, शेतकरी कर्जमाफी, सरकारची धोरणे यांसह इतर प्रमुख मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपमधील मराठी नेत्यांना शाब्दिक फटकारे मारले. भाजप सरकारच्या सर्व ‘आतल्या गोष्टी’ मला समजल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकांवेळी भाजप काय करणार आहे, त्यांची रणनिती काय असेल, याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे, असे सांगून त्यांनी एकेक पत्ते उघड केले. दाऊदला भारतात यायचे आहे. सध्या दाऊद विकलांग झाला आहे. त्याला भारतात यायचे आहे. भारतात येऊन मरण्याची त्याची इच्छा आहे. सध्या त्याची केंद्र सरकारशी ‘सेटलमेंट’ सुरू आहे, असा गौप्यस्फोट राज यांनी केला. दाऊदला आम्ही भारतात आणले, याचे श्रेय या भाजप सरकारला घ्यायचे आहे. त्याला भारतात आणतील आणि त्याचे श्रेय हे भाजप सरकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.