२६ जुलै २००५.. अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार माजला असतानाच घाटकोपर पश्चिम भागातील आझाद नगर परिसरात दरड कोसळून तेव्हा ७३ जण दगावले होते. डोंगरावर मोठय़ा प्रमाणावर अनधिकृतपणे झोपडय़ा उभारण्यात आल्या होत्या. या झोपडय़ांवर दरड कोसळली होती. या दुर्घटनेनंतर परिसराची पाहणी करण्याकरिता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आल्या होत्या. चिखल तुडवीत सोनियांच्या गाडय़ांचा ताफा डोंगरावर गेला होता. सोनिया येणार असल्याने खडी टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. डोंगराच्या उतरणीवर ज्या अवस्थेत लोक राहात होते, ते बघून सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि स्थानिक आमदार नसिम खान यांना झोपडपट्टीवासीयांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, अशी सूचना केली होती. पण अजूनही झोपडय़ा तशाच आहेत.
काही भीषण दरड दुर्घटना
*३ सप्टेंबर, २००९- साकीनाका, १५ ते २० घरे जमीनदोस्त, ११ ठार तर १३ जखमी.
*१० जुलै, २०१३ – अँटॉप हिल, पाच ठार.
*२९ ऑगस्ट, २०११ – हाजी अली, १ ठार.
*१७ ऑगस्ट, २०१० – साकीनाका, १ ठार.
*२४ जुलै २०१० रोजी कोकणात मुसळधार पावसामुळे निवसर स्थानकाजवळ दरड कोसळली, रेल्वेमार्ग खचला आणि संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग बंद पडला. सुमारे पाच हजार प्रवासी त्यामुळे अडकले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूकही विस्कळीत झाली होती.
’मुंबईतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये १९९३ पासून आतापर्यंत एकूण २०८ जण ठार तर ९० जण जखमी झाले आहेत.