स्थलांतराला विलंब झाल्यामुळे वीजजोडणी तोडली कुलाबा-सीप्झ या मार्गावरील भुयारी मेट्रो-३ या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या राजकीय पक्ष कार्यालयांना नोटीस बजावूनही ती वेळीच स्थलांतरित न झाल्याने अखेर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रविवारी उशिरा या कार्यालयांची वीज जोडणी तोडली. एमएमआरसीच्या या कारभारावर सर्वच पक्षांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या संबंधात सर्व पक्षांचे नेते एमएमआरसी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत. मेट्रे-३ प्रकल्पात नरिमन पॉइंट परिसरातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप आदी राजकीय पक्षांची कार्यालये विस्थापित होणार आहेत. या सर्व पक्षांच्या कार्यालयांचे तात्पुरते पुनर्वसन इतरत्र करण्यात आले आहे. त्यानुसार या पक्ष कार्यालयांना नियोजित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. राजकीय पक्षांची कार्यालये स्थलांतरित होत नसल्यामुळे एमएमआरसीला पुढील कामासाठी विलंब होत आहे. परिणामी या प्रकल्पाचे कामही रखडले होते. त्यामुळे एमएमआरसीने सर्व राजकीय पक्ष कार्यालयांना नव्याने नोटिसा पाठवत २१ एप्रिलला कार्यालये रिकामी करण्याचे आदेश दिले होते. राजकीय पक्षांनी त्या नोटिशीची दखल घेतली नाही. कार्यालये रिकामी न केल्यामुळे २३ एप्रिलला, रविवारी एमएमआरसीने त्या परिसरातील सर्व राजकीय पक्ष कार्यालयांची वीजजोडणीच कापली. कार्यालये स्थलांतरित करण्याबाबत एमएमआरसीसोबत चर्चा सुरू होती. आम्ही स्थलांतरासाठी होकारही दर्शवला होता. सामान कसे, कधी हलवायचे याविषयीही सोमवारी, २४ एप्रिलला अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरले होते. असे असताना एमएमआरसीने अचानक वीज कापल्यामुळे आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आम्ही दोन जागा निवडल्या असून त्यातील एका जागेबाबत निर्णय होणार होता. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले. एमएमआरसीने आम्हाला योग्य वेळेत जागा उपलब्ध करून दिली नाही. जागा उपलब्ध करून न देताच थेट आमच्या कार्यालयाची वीजजोडणी तोडली. आम्ही स्थलांतराला होकार दर्शवला असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी हे कृत्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे या सर्व बाबींना दिरंगाई करणाऱ्या व जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ..तरी कार्यालये सुरूच एमएमआरसीने राजकीय पक्ष कार्यालयांची वीज जोडणी तोडली असली तरी सर्वच राजकीय पक्ष कार्यालयांत सोमवारी कामकाज सुरू होते. पक्ष कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडथळे उभारण्यात आले होते. त्यामुळे मागच्या बाजूने वळसा घालून कार्यालयात प्रवेश करावा लागत होता. सदर जागेचा ताबा राज्य सरकारने एमएमआरसीला दिला आहे. पक्षांच्या कार्यालयांना स्थलांतरित करण्याची नोटीस राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे मेट्रो ३च्या कामासाठी त्वरित जमीन रिकामी करणे आवश्यक होते. म्हणून नाईलाजाने हे पाऊल उचलल्याचे एमएमआरसीएलचे प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.