अवघ्या देशाचा कायापालट करण्याची ताकद आपल्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. या संकल्पनेचा पहिला आविष्कार मुंबईत शनिवारपासून सुरू होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ सोहळ्यात अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. त्या निमित्ताने मुंबईची हॉटेल्स तुडुंब भरून वाहू लागली आहेत.. बॉलीवूडकर पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.. विद्यार्थी आणि कलाकार आपल्या कलाकृतींच्या सादरीकरणातून ‘मेक इन इंडिया’चे सारसूत्र मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत.. पण, हा सोहळा संपल्यानंतर काय? ‘आमच्या मुंबई’ला यातून काय मिळणार? सर्वसामान्य मुंबईकरांना पडलेल्या या प्रश्नाचा धांडोळा या सोहळ्यात ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील परिषदेच्या निमित्ताने घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. या परिषदेचा भर मुंबईची आधीचीच ‘आर्थिक राजधानी’ म्हणून असलेली ओळख आणखी पक्की करण्यावर असणार आहे. अर्थात या प्रयत्नांना कितपत यश मिळेल आणि मुंबईकरांचे रोजगार, पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने या दृष्टीने जीवन किती सुसह्य़ होईल हे येणारा काळच ठरवेल.
(‘मुंबई वृत्तांत’मध्ये ‘मेक इन इंडिया’तली मुंबई शोधण्याचा प्रयत्न केला आहे, प्रसाद रावकर, रेश्मा राईकवार आणि मीनल गांगुर्डे यांनी.)