विद्यापीठाच्या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध मुंबई विद्यापीठाच्या रखडणाऱ्या निकालांवर तोडगा म्हणून कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिलपासून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध स्तरांवरून विरोध होत आहे. याचबरोबर या उत्तरपत्रिका तपासणीसाठी निवडलेल्या शिक्षकांच्या पात्रतेबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे. असे असतानाही यंदा उत्तरपत्रिका तपासणीचे काम ऑनलाइन करण्यावरच विद्यापीठ प्रशासन ठाम असल्याचे समजते. परीक्षा संपून काही दिवस उलटले असून परीक्षा विभागात दिवसागणिक उत्तरपत्रिकांचा खच वाढू लागला आहे. या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. इतकेच नव्हे तर ऑनलाइन प्रक्रियेसाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला म्हणावा तितका प्रतिसादही मिळत नाही. असे असतानाही ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापकांचे आवश्यक ते प्रशिक्षण ठरलेल्या वेळेतच पूर्ण होणार असून निकाल रखडणार नसल्याचा विश्वास विद्यापीठातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेसाठी नियम शिथिल? विद्यापीठाने ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी दोन वेळा ई- निविदा प्रक्रिया जाहीर केली. पहिल्या वेळेस अवघ्या दोनच कंपन्यांनी भाग घेतला. दुसऱ्या वेळेसही म्हणावा तितका प्रतिसाद नसल्यामुळे प्रक्रियेची मूदत २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. याचबरोबर या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ज्या कंपन्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या कंपन्यांची आर्हता विद्यापीठाने निश्चित केलेल्या आर्हतेपेक्षा तुलनेत कमी आहे. यामुळे विद्यापीठ या प्रक्रियेसाठीचे नियम शिथिल करण्याचाही निर्णय घेतल्याचे समजते. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागतील की नाही याबाबत चिंता व्यक्त होत आहे.