उत्तरपत्रिकांच्या ‘स्कॅनिंग’ प्रक्रियेमध्ये गोंधळ; २६०० उत्तरपत्रिकांची सरमिसळ मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या गोंधळामध्ये २८ हजार विद्यार्थ्यांच्या नव्हे तर २६०० उत्तरपत्रिकांची इतर विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये सरमिसळ झाली आहे. त्यापैकी ९०० उत्तरपत्रिकांचा शोध लागला असून उर्वरित १७०० उत्तरपत्रिकांची शोधमोहीम सध्या विद्यापीठात सुरू आहे. विद्यार्थ्यांचे निकाल रखडले असल्याने युद्धपातळीवर या उत्तरपत्रिकांची शोधाशोध सध्या केली जात आहे. दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हजेरीच्या यादीसह विषयानुसार उत्तरपत्रिकांचे गठ्ठे महाविद्यालयाकडून परीक्षा भवनात पाठविले जातात. त्यानंतर या गठ्ठय़ावरील यादीनुसार उत्तरपत्रिका आहेत का, याची परीक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जाते. उत्तरपत्रिका ठेवण्याच्या गोदामामध्ये विषयानुसार वर्गवारी केलेल्या खणांमध्ये या गठ्ठय़ांची रवानगी केली जाते. परंतु यावर्षी ऑनलाइन मूल्यांकन करण्याचा घाट विद्यापीठाने घातला असल्याने महाविद्यालयाकडून आलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मे महिना उजाडला तरी 'जैसे थे' परिस्थितीतच होते. त्यांनतर मेरिट ट्रॅक कंपनीने या उत्तरपत्रिकांचा ताबा घेतला आणि स्कॅनिंगची प्रक्रिया सुरू केली. लाखो उत्तरपत्रिकांचे गठ्ठे हाताळण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने स्कॅनिंगसाठी गठ्ठे खोलताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गोंधळामध्ये या उत्तरपत्रिका हरवल्या असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ‘संगणक आधारित मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका स्कॅन करताना २८ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका नव्हे तर २६०० उत्तरपत्रिका विखुरल्या गेल्या आहेत. यातल्या काही उत्तरपत्रिका या एका गठ्ठय़ातून दुसऱ्या गठ्ठय़ात गेल्या आहेत. तर काही उत्तरपत्रिका या स्कॅन झाल्यानंतर इतरत्र विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये जतन करण्यात आल्या आहेत. यापैकी ९०० उत्तरपत्रिका शोधून त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तर १७०० उत्तरपत्रिका प्रत्येक विषयांच्या गठ्ठय़ामध्ये शोधण्याचे काम आता सुरू आहे,’ असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले आहे. प्रथम सत्राच्या परीक्षा दिवाळीनंतर? विद्यापीठाने जाहीर केलेल्या पुढील सत्राच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पुढील सत्राच्या परीक्षांचे वेळपत्रक जाहीर केल्यानंतर बुक्टू संघटनेने प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेऊन प्रथम सत्र उशिरा सुरू झाल्याने या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पुनर्मूल्यांकन अर्जाच्या अंतिम मुदतीला स्थगिती उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी ३३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून छायांकित प्रतीसाठी ६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यंदा निकाल जाहीर झाला तरी राखीव ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहेत. त्यामुळे यावर्षी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची कोणत्याही शाखेसाठी अंतिम मुदत असणार नाही. विद्यार्थ्यांना निकाल समजल्यावर त्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे अर्ज सादर करावेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक अर्जुन घाटुळे यांनी सांगितले आहे.