देशभरातील प्रवाशांना रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी दरवाढीचा दणका दिला असला तरी त्याचा सर्वाधिक फटका दररोज किमान ६० ते ८० कि.मी. सरासरी प्रवास करणाऱ्या मुंबईतील उपनगरी प्रवाशांनाच बसणार आहे. प्रति कि.मी. केवळ दोन पैसे वाढ केल्याचा रेल्वेमंत्र्यांचा दावा असला तरी प्रत्यक्षात सुसूत्रीकरणाच्या नावाखाली छुपी दरवाढ लादली जाणार आहे.
 दरवाढीतून मिळणाऱ्या ६६०० कोटी रुपयांपैकी तब्बल तीन ते साडेतीन हजार कोटी म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक उत्पन्न मुंबईकर प्रवाशांकडून रेल्वेला मिळणार आहे.
उपनगरी प्रवाशांवर १ जानेवारीपासून अधिभार लादल्याने तिकीट व पासाचे दर वाढले होते. सेवा शुल्क, विकास शुल्क, अधिभार यांचा बोजा असताना प्रवास भाडय़ातील वाढीतून उपनगरी प्रवाशांना वगळणे आवश्यक होते; परंतु रेल्वेमंत्र्यांनी तसे केले नाही. त्याशिवाय, प्रति कि.मी. केवळ दोन पैसे दरवाढ केल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात सुसूत्रीकरण करत असताना तिकीट व पासाचे दर एक रुपयाच्या पटीत वाढविण्यात येत असल्याने छुपी दरवाढ लादली जाणार आहे. प्रवासी भाडय़ात गेली अनेक वर्षे वाढ न केल्याचे कारण दिले असले तरी वेगवेगळ्या शुल्क व अधिभाराच्या नावाखाली तिकीट व पासाचे दर वाढविण्यात आलेले आहेत.

मुंबईला एक हजार कोटी रु. मिळावेत
देशातील उपनगरी प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ८५ टक्क्य़ांहून अधिक वाटा मुंबईकर प्रवासी उचलतात. मुंबईत गर्दीच्या वेळी १२ डब्यांच्या गाडीतून तीन-साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. तरीही मुंबईकर प्रवाशांच्या सेवासुविधांसाठी गेल्या वर्षी केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासाठी किमान एक हजार कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांनी केली.