ज्येष्ठ गायक आणि संगीतकार रवींद्र जैन यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जैन यांची प्रकृती चिंताजनक होती. मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांना ग्रासले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती खालावली आणि चार वाजून १० मि. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोनच दिवसांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले होते. जीवन आश्रम विकास संस्थेच्या वतीने संस्थेच्या मदतीसाठी रवींद्र जैन यांचा नागपूरातील वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना धंतोलीतील प्लॅटिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना शंकरनगरातील वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृती आणखीनच चिंताजनक झाल्याने अखेर त्यांना हवाई रुग्णवाहिकेने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी हलविण्यात आले होते. 'हिना', 'राम तेरी गंगा मैली', 'पहेली', 'चोर मचाए शोर', 'गीत गाता चल' या चित्रपटांना रवींद्र जैन यांनी दिलेले संगीत विशेष गाजले. 'रामायण'लाही त्यांनीच संगीत दिले होते. 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सुरांना साज चढविणारा संगीतकार हरपला दुरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या रामायण व श्रीकृष्ण या दुरदर्शन मालिकांचे संगीताने या मालिकांची खरी ओळख घराघरांत निर्माण झाली होती. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. रवींद्र जैन यांच्या निधनाने सुरांना साज चढविणारा संगीतकार हरपला - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री