भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी ; आता विधिमंडळाबाहेरही संघर्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून विधिमंडळात एकजुटीच्या जोरावर सत्ताधाऱ्यांची कोंडी करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आता लहान-मोठय़ा सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून विधिमंडळाच्या बाहेरही भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्य़ांतूनच उद्यापासून (२९ मार्च) विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात होत आहे. भविष्यातील भाजपविरोधी आघाडीच्या नवीन राजकीय समीकरणाची ही जुळवाजुळव असल्याचे मानले जात आहे. राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने, सारेच पक्ष चकित झाले आहेत. ग्रामीण भागातही भाजुपने मुसंडी मारल्याने, त्याचा मोठा धक्का काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पराभवाने विचलित झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आणून विधिमंडळात सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या आठवडय़ाला उद्या सुरुवात होईल. मागील तीन आठवडय़ांत विधानसभेतील थोडा अपवाद वगळला तर फारसे कामकाज झाले नाही. विधानसभेत सत्ताधारी भाजप व शिवसनेचे बहुमत आहे. त्यामुळे काही प्रमाणात राज्य सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने सत्ताधारी भाजपला अनेकदा नरमाईची भूमिका घ्यावी लागत आहे. विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांना निलंबित करून विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र विधान परिषेदतही गोंधळ घालणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याचे धाडस सत्ताधारी भाजपला दाखवता आले नाही. त्याच वेळी विधानसभेत मंजूर झालेले ५६ हजार कोटी रुपयांचे विनियोजन विधेयक (लेखानुदान) रोखून धरल्याने सरकारची कोंडी झाली. आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत मिळाल्याने हे विधेयक मंजूर करून देण्यास विरोधकांनी सहकार्य केले. परंतु गेल्या तीन आठवडय़ांत किरकोळ अपवाद वगळता विधान परिषदेचे कामकाज झालेले नाही. या अधिवेशनात पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य लहान पक्षांची भक्कम आघाडी दिसली. खासकरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एकजुटीने सत्ताधारी भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत वरचढ होऊ लागलेल्या भाजपच्या विरोधात आता विधिमंडळाच्या बाहेरही विरोधी पक्षांची एकसंध आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात निर्णय घेऊ : अशोक चव्हाण संघर्ष यात्रेत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष, एमआयएम, इत्यादी पक्ष सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष यात्रेत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, भविष्यात बघू या काय करायचे ते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. राज्यातील सत्तांतरानंतरच्या अडीच वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या व १९ आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावर सर्व विरोधी पक्ष राज्य सरकारच्या विरोधात एकत्र आले आहेत. संघर्ष यात्रा ही त्याची सुरुवात आहे, भाजपच्या विरोधात अशीच एकत्र आघाडी उभी करायची का, याबाबत पुढे काय तो विचार होईल, असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.