प्रगतीबाबत पालक अंधारात; छपाईला विलंब झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

मुंबईमधील पालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकच देण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांला नापास करायचे नाही असा नियम असल्यामुळे आपल्या मुलाची अभ्यासात झालेली प्रगती प्रगतीपुस्तकातील शेऱ्यांवरुन स्पष्ट होते. परंतु प्रगतीपुस्तकच देण्यात न आल्याने मुलाच्या प्रगतीबाबत पालक चिंतीत झाले आहेत. तर प्रगतीपुस्तकाबाबत निरनिराळी उत्तरे देत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संभ्रम अधिकच वाढवला आहे. वार्षिक परीक्षेनंतर तरी प्रगतीपुस्तक मिळणार की नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील असुविधांमुळे विद्यार्थ्यांची गळती सुरूच आहे. गळती रोखण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू आणि माध्यान्ह भोजन, सुगंधी दूध देण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून २७ शालोपयोगी वस्तू वेळेवर मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना दुधाची बाधा झाल्यामुळे ते बंद करण्यात आले आहे. शेंगदाण्याची चिक्की देण्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून पालिका दरबारी अद्याप खलच सुरू आहे. गेल्या वर्षभरात पालिका शाळांमध्ये झालेली चाचणी व सहामाही परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना प्रगतीपुस्तकच दिलेले नाही.