आमची चौकशीतून सारे सत्य बाहेर येईलच, पण त्याच वेळी शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखविणार का, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.
मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नगण्य असल्याने पक्षाने सध्या मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतील सहाही जिल्ह्य़ांमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुनील तटकरे यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतील गैरव्यवहारांचा मुद्दा हातात घेतला आहे. करून दाखविले अशा जाहिराती करणाऱ्यांनी काहीही केले नसून, फक्त स्वत:ची घरे भरल्याची टीका मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.