माळीण दुर्घटनेनंतर सरकारला जाग आली असून, धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांमधील लोकांचे स्थलांतर करावे, असे फर्मान गुरुवारी सरकारने काढले आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माळीण दुर्घटनेचे पडसाद उमटले. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून धोकादायक किंवा डोंगराच्या उतरणीवर असलेली घरे किंवा झोपडय़ांचे स्थलांतर करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी आधी सर्वेक्षण करावे लागणार आहे. माळीणसारखी संभाव्य दुर्घटना टाळण्याकरिता पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतील अशा भागांमधील घरांचे स्थलांतर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  दरम्यान, गुजरातच्या धर्तीवर राज्यातही आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती निवारण विभागाच्या संचालिका आय. ए. कुंदन यांनी दिली. दुर्गम भागात आपत्ती घडल्यास संपर्क साधणे कठीण जाते. याचा अनुभव माळीणमध्येही आला. यामुळेच सर्व विभागीय मुख्यालयांमध्ये मोबाइल नियंत्रण वाहन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.