नव्या बांधकामात अनधिकृत घरांची अडचण पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंत खचल्याने गेल्या आठवडय़ात मध्य रेल्वे कोलमडल्यानंतर आता ही संरक्षक भिंत नव्याने उभारण्याची तयारी रेल्वेने केली आहे. ही भिंत पाच मीटर मागे बांधण्यात येईल. हे काम पावसाळ्यात सुरू होणार असले, तरी त्यात अनधिकृत घरांची अडचण येत आहे. ठाणे पालिकेने ही घरे हटवल्यावरच या भिंतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. अनधिकृत बांधकामे, कचरा आणि पाऊस यांमुळे बोगद्याच्या दोन्ही टोकांवरील जमीन खचत चालल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. कल्याण दिशेकडील पारसिक बोगद्याच्या तोंडावरील संरक्षक भिंत खचल्याने रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण झाला. रेल्वे आणि महापालिका यांनी ही भिंत पाडून टाकली. त्यानंतर रेल्वे बोर्ड व आरडीएसओ अधिकाऱ्यांच्या समितीने ही भिंत नव्याने बांधण्याची सूचना केली. त्यानुसार पारसिक बोगद्याच्या दोन्ही टोकांना दोन्ही बाजूंच्या भागात इंग्रजी ‘सी’ आकारात भिंत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली.