फेसबुकवरून आपले मत व्यक्त करणाऱ्या दोन तरुणींना पालघर पोलिसांनी केलेली अटक चुकीची असल्याचा निष्कर्ष कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी आपल्या अहवालात काढला आहे. याप्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्या बंदबाबत पालघरमध्ये राहणाऱ्या शाहिन धडा या तरुणीने फेसबुकवरुन स्टेटस अपडेट करतांना नापसंती व्यक्त केली होती. या स्टेटसला तिची मैत्रीण रेणू हिने सुद्धा लाईक केले होते. यामुळे पालघरमधील शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून या दोघींवर कारवाईची मागणी केली होती. पालघर पोलिसांनी या दोघींनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली होती. ही दोन्ही कलमे चुकीची होती तसेच त्यांना केलेली अटक हीसुद्धा चुकीची असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. याशिवाय काही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करण्याची शिफारससुद्धा करण्यात आली आहे. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महनिरीक्षक सुखविंदर सिंग यांनी हा अहवाल तयार केला आहे. एकूण दिडशे पानांच्या या अहवालात एकुण १५ जणांचे जबाब तपासण्यात आले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.