महाराष्ट्रभर सामाजिक असंतोषाला कारणीभूत ठरलेल्या जवखेडय़ातील क्रूर तिहेरी दलित हत्याकांडाला एक महिना उलटून गेला तरी, पोलिसांना अजून गुन्हेगार सापडले नाहीत, उलट आता पोलिसांनी जाधव कुटुंबावरच संशय घ्यायला सुरुवात केली असून मृत संजय जाधव याचा भाऊ रवींद्र जाधव याला खुनाच्या गुन्ह्यात गोवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून धमकावले जात आहे. तर संजयच्या भावानेच तीन खून केल्याचा जबाब देण्यासाठी दुसऱ्या एका नातेवाईकाला एक लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. रवींद्र जाधव याने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावाने प्रतिज्ञापत्र सादर केल्याने या प्रकरणाला आता आणखी वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत. जवखेडा येथील संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील याची अमानुष हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिना उलटून गेला. परंतु पोलिसांना अजून आरोपींचा छडा लागलेला नाही. त्यामुळे जाधव कुटुंब तर पूर्णपणे खचले आहे, त्याचबरोबर पोलिसांच्या या अपयशामुळे राज्यभर त्याविरोधात तीव्र आंदोलने सुरू आहेत. मृत संजय याचे वृद्ध आई-वडील साखराबाई व जगन्नाथ जाधव, भाऊ रवींद्र, दिलीप, त्यांचे सारे कुटुंब मुंबईत आले आहे. आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी आमचाच कसा छळ चालवला आहे, त्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या नावे उच्च न्यायालयाला सादर केले आहे. रिपब्लिकन पक्ष (सेक्युलर) व दलित हत्याकांडविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्याम गायकवाड, मिलिंद भवार, डॉ. विठ्ठल शिंदे, रवींद्र चंदने, उदय चौधरी यांच्या समवेत जाधव कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडली. ‘तू खून केल्याचे कबूल कर नाही तर तुझे सगळे कुटुंब तुरुंगात जाईल,’ अशी धमकी पोलीस अधीक्षकांनी आपणास बोलावून दिली, असे रवींद्र जाधव यांनी सांगितले. ‘कुटुंबातील महिलांना रात्री-अपरात्री बोलावून पोलीस नको ते प्रश्न विचारून त्यांचा मानसिक छळ करीत आहेत. जातीय विद्वेषातून हे हत्याकांड झाले आहे, आम्ही काही माहितीही पोलिसांना पुरवली. जवळच्या धाब्यावर येणाऱ्यांची चौकशी करा असे सांगितले. परंतु पोलीस त्याकडे दुर्लक्ष करून आम्हालाच संशयित आरोपी करीत आहेत. आमच्याच निरनिराळ्या मानसिक चाचण्या घेतल्या जात आहेत. आमचे एक नातेवाईक नाथाभाऊ अल्हाट यांना, एक लाख रुपये तुला देतो संजयच्या भावानेच खून केल्याचा जबाब दे, असा त्याच्या मागेही काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तगादा लावला आहे, असे आरोप प्रतिज्ञापत्रात करण्यात आले आहेत. कुटुंबातील तीन माणसे मारली गेली, वर पोलिसांचा छळ, त्यामुळे सारे जाधव कुटुंब भयभीत झाले आहे. पोलिसांकडून न्याय मिळण्याची शक्यता आता मावळली आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी श्याम गायकवाड यांनी केली आहे.