दिशादर्शक संदेश देणारी देशातील पहिलीच यंत्रणा मुंबईत

मुंबईतील बेदरकार आणि बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता ‘ई-चलन’ योजनेपाठोपाठ शहरातील वाहतुक कोंडी टाळण्याकरिता आणि तिला ‘वळण’ लावण्यासाठी वाहनचालकांच्या मदतीला अत्याधुनिक ‘पोर्टेबल व्हीएमसी’ नावाचे सौरऊर्जेवर चालणारे डिजीटल प्रणालीचे उपकरण येणार आहे. देशातील ही पहिलीच दिशादर्शक व डिजिटल संदेश देणारी यंत्रणा असून यामुळे शहरातील कोंडीच्या ठिकाणांचा ‘लाइव्ह’ लेखाजोखा चालकांना मिळणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होईल, असा वाहतूक पोलिसांचा दावा आहे.

सीसीटीव्ही कॅमेरांना जोडलेल्या ई-चलनप्रणालीमुळे वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम होत आहे, परंतु मुख्य रस्त्यांबरोबरच वळणावळणावर मिळणाऱ्या वाहतूक कोंडीचे काय? त्यासाठीच पोलिसांबरोबरच चालकांनाही संदेश देणारी ही सेवा मुंबई वाहतूक पोलिसांच्या सेवेत दाखल होणार आहे. पालिकेच्या रस्ते विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईतील ‘दिशादर्शक माहिती फलकां’ची अवस्था सध्या वाईट आहे. त्यामुळे अशी यंत्रे मुंबईकर वाहनचालकांच्या सेवेला उपलब्ध झाल्यास रस्त्यावरील वाहनकोंडीबरोरच रस्ता शोधण्याच्या प्रश्नातून सुटका होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास वाहतूक पोलिसांना वाटतो.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई वाहतूक पोलिसांच्या सेवेत अनेक नवनवीन यंत्रणा दाखल होत आहे. यातलेच एक पोर्टेबल व्हीएमसी (व्हच्र्युव्हल मेसेजिंग सिस्टीम) ही सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणा. सध्या यातील तीन यंत्रे दाखल झाली असून त्याचा पहिला प्रयोग वानखेडे येथे सुरू असलेल्या भारत-इंग्लड कसोटी सामन्यादरम्यान होणार आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ही यंत्रणा ज्या विभागात असेल, त्या भागात कोणत्या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे, वाहतुकीचा मार्ग कुठे मोकळा आहे, कुठे वाहतूक कोंडी सर्वाधिक आहे, दिशादर्शक, महत्त्वाचे सभागृह कार्यक्रम कोणते सुरू आहेत, त्यामुळे कोंडी टाळण्याकरिता वाहनांनी कोणत्या मार्गाने वळावे, अशी महत्त्वाची माहिती वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे. ही संपूर्ण माहिती अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस नियंत्रण कक्षातून या प्रणालीवर उपलब्ध होईल. त्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) साहाय्याने मुंबई शहर आणि उपनगरातही ही उपकरणे बसविण्यात येतील. त्यासाठी इतर काही कंपन्यांसोबतही वाहतूक पोलीस करार करण्याच्या विचारात आहेत.

कुठेही नेता येईल

हे यंत्र संपूर्ण जीपीएस प्रणालीवर चालणारे आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचे असलेले हे तंत्र सौरऊर्जा आणि बॅटरी या दोघांवर चालणारे आहे. याला दोन चाके असल्याने ते कुठेही नेता येऊ शकेल. भारत-इंग्लंड कसोटी सामन्याचे स्थळ असलेल्या वानखेडे मैदानापासून काही अंतरावर हे उपकरण ठेवण्यात आले आहे.