ज्या सन्मानाचा मुद्दा घेऊन शिवसेनेने वानखेडेवर होणाऱय़ा शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला होता, तो भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी फोन केल्यामुळे बाजूला ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथविधीला जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेली दरी या हालचालींमुळे मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेशी असलेली युती भाजपने तोडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण झाली होती. त्यातही प्रचाराच्या काळात शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कडवी टीका केली होती. त्याचवेळी अमित शहा यांनी सुद्धा वाघाला उंदीर करायचे असल्याची प्रतिकात्मक टीका करीत शिवसेनेवर हल्ला केला होता. या सर्वपार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यांचे १२२ उमेदवारच विजयी झाले आणि शिवसेनेला ६३ जागांवर विजय मिळाला. एकप्रकारे या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असाच कौल राज्यातील मतदारांनी दिला. मात्र, मतमोजणीनंतरही दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीने फारशा सकारात्मक हालचाली होत नव्हत्या. पडद्याआडून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना भेटत असले, तरी अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. आता अमित शहा यांनी स्वतःच उद्धव ठाकरे यांना फोन केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेसाठी आवश्यक वातावरण तयार झाले असल्याचे मानण्यात येत आहे. शहा यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीसुद्धा मोताश्रीवर फोन करून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.