लोकसभा निवडणुकीत फक्त अकोला मतदारसंघात वैयक्तिक पाठिंबा देण्याचा ‘आम आदमी पक्षा’चा प्रस्ताव भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी फेटाळून लावला. भारिपप्रणित महाराष्ट्र लोकशाही आघाडी राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर आघाडीच्या पहिल्या १३ उमेदवारांजी यादीही जाहीर करण्यात आली.
काँग्रेसबरोबर युती होत नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी आपशी निवडणूक समझोता करण्याची भूमिका घेतली होती. त्यांच्या आघाडीच्या बैठकीत तसा निर्णय झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेनेच्या विरोधातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि तिसरा सक्षम पर्याय लोकांसमोर ठेवण्यासाठी आप व भारिप आघाडीने एकत्र यावे व ४८ जागांवर लढावे असा भारिपने आपला प्रस्ताव दिला होता. त्यांना उत्तरासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आपचे उत्तर आले. परंतु आपने फक्त अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीत वैयक्तीक पाठिंबा देण्याचा हा प्रस्ताव फेटाळून
लावण्यात आला.
आंबेडकर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांना सोडल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यावर माणिकारांवाना जागा वाटपाचा अधिकारच नाही, त्यामुळे त्यांचे वक्तव्य निर्थक आहे, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी व्यक्त केली.

‘भारिप’चे उमेदवार
अकोला : प्रकाश आंबेडकर<br />भंडारा : गोंदिया-अंजली पटले
गडचिरोली : चिमूर-सतीश पेंडाम
यवतमाळ : वाशिम-शकील पटेल
लातूर : वसंत उबाळे
जालना : रामभाऊ उगले
शिरुर : गीताराम कदम
हातकणंगले : दिगंबर सकट
पालघर : मोहन घुले
भिवंडी : कैलास जाधव
पुणे : नाना क्षिरसागर
उस्मानाबाद : गुंडुराव बनसोडे
नांदेड : व्यंकट नाईक