महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे राष्ट्रपती सामान्यांच्या विषयांवर काही करत नाहीत, असे राष्ट्रपती लोकांच्या काय कामाचे असा सवाल करत ज्यांची सत्ता त्यांचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती असा उल्लेख राज ठाकरेंनी करून नवा वाद ओढवला आहे.

‘एबीपी माझा’बरोबर बोलताना त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत मत व्यक्त केले. देशात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत, मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. त्यावेळी कुठं होते राष्ट्रपती. या विषयावर त्यांनी काय केलं. देशातील नागरिक त्यांना पत्र पाठवून, इ मेल करून त्यांच्या प्रश्नांविषयी सांगतात. एकालाही त्यांनी उत्तर दिल्याचं ऐकलं नाही. मग असे राष्ट्रपती आमच्या काय कामाचे, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्याचे सरकार असते त्यांचाच राष्ट्रपती असतो. त्यामुळे काही उपयोग नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.

केंद्र व राज्य सरकारकडून दडपशाही सुरू आहे. त्याबद्दल ते राष्ट्रपती कधी बोलतही नाहीत. याकूब मेमनच्या फाशीप्रसंगी राष्ट्रपतींचा उल्लेख झाला होता. त्याशिवाय त्यांचं नावही ऐकायला मिळत नाही. महत्वाच्या विषयांवर त्यांनी काय भूमिका निभावली आहे. मग अशावेळी कोणीही राष्ट्रपती होवोत आम्हाला काय करायंचं. राष्ट्रपती कोविंद झाले काय नी गोपाळ झाले काय आम्हाला काहीच फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावरही भाष्य केलं.