गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचारातील सहभागावरून सार्वजनिक बांधकाम खात्यात आतापर्यंत १००च्या आसपास अभियंते वा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने या खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून आनंद कुलकर्णी यांनी या खात्यात सफाई मोहीमच हाती घेतली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक विभागांतील मोठय़ा प्रमाणावर अभियंते व कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झालेल्या अभियंत्यांना निलंबित करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळातील काही वादग्रस्त प्रकरणांची छाननी बांधकाम विभागाकडून सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही वादग्रस्त प्रकल्पांतील गैरव्यवहार बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार नाशिक, औरंगाबाद विभागांमध्ये झालेल्या काही प्रकरणांची छाननी सुरू असल्याचे समजते. काही प्रकरणांमध्ये किमती फुगविणे, अनियमितता, ठरावीक ठेकेदारांना झुकते माप असे प्रकार आढळले आहेत. त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, छाननीनंतर आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.  तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या कार्यक्षेत्रात काम केलेले अधिकारी किंवा अभियंते सध्या रडारवर असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा आणि बांधकाम खात्यातील गैरव्यवहारांची युती सरकारने चौकशी सुरू केली. बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला असला तरी जलसंपदा विभागाने अजून तरी कारवाई केलेली नाही.
वीज दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
मुंबई : रिलायन्स, टाटा, बेस्ट आणि वीज वितरण कंपनी या मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. वीज दरवाढीच्या निषेधार्थ मुंबईत पुढील दोन दिवस ३५० ठिकाणी स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, डाळी आदींचे भाव वाढले असतानाच सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक बसल्याने काँग्रेसने सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन हाती घेतला आहे.