मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला येत्या १५ दिवसांत आरक्षण न मिळाल्यास राज्यात गुजरातप्रमाणेच जनक्षोभ उसळेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिला.
पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, यासाठी गुजरातमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी रात्रीपासून हिंसक वळण लागले आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली असून, काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय १५ दिवसांत न झाल्यास राज्यात गुजरातप्रमाणे जनक्षोभ उसळेल.