टिटवाळा आंदोलनामुळे १४ फेऱ्या रद्द, ५०हून अधिक सेवा दिरंगाईने प्रवासी संघटना व रेल्वे अधिकारी यांचे मत; - सततच्या ‘रेल्वे रोको’ आंदोलनांचा लाखो प्रवाशांना फटका राज्य सरकारने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवांच्या यादी रिक्षा आणि टॅक्सी यांचा समावेश आहे, पण रेल्वे केंद्राचा विषय असल्याने ही सेवा अत्यावश्यक मानली जात नाही. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेशी संबंधित नसलेल्या कारणांसाठीही रेल्वेमार्गावर येऊन रेल्वे रोको आंदोलन करण्याचे खूळ आले असून या पाश्र्वभूमीवर आता उपनगरीय रेल्वे सेवेलाही अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी प्रवासी संघटना आणि रेल्वे अधिकारी यांच्याकडून पुढे येत आहे. गुरुवारी टिटवाळा येथे झालेल्या आंदोलनानंतर ही मागणी जोर धरत असून आंदोलकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही समोर येत आहे. याआधी गेल्या दोन आठवडय़ांमध्ये डोंबिवली येथे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारवाईच्या वेळी तेथील रहिवाशांनीही रेल्वेमार्गावर धाव घेत रेल्वे रोको आंदोलन केले होते. त्यानंतर दिवा येथे दिवा-रोहा पॅसेंजर गाडी उशिराने आल्याने प्रवाशांनी उपनगरीय रेल्वेमार्ग रोखून धरला होता. काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे झालेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची बदली करण्यात आली होती. त्या वेळी केवळ दहा मिनिटे गाडी उशिराने आल्यामुळे हे आंदोलन झाले होते. अनेकदा स्थानिकांकडून रेल्वे वाहतुकीला लक्ष्य केले जात असल्याने रेल्वे अधिकारीही हतबल झाले आहेत. रेल्वेशी काहीही संबंध नसताना रेल्वेबाह्य़ मुद्दय़ावरून रेल्वे रोको केल्यामुळे त्याचा फटका लाखो प्रवाशांना बसतो. गुरुवारी सकाळी ९३ टक्के असलेला मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा टिटवाळा येथील आंदोलनामुळे संध्याकाळी गर्दीच्या वेळी पूर्णपणे कोलमडला. या आंदोलकांवर कारवाई करण्याचे अधिकार रेल्वे सुरक्षा दलाकडे नाहीत. हे अधिकार राज्य सरकारच्या लोहमार्ग पोलीस आणि पोलिसांकडे आहेत. त्यामुळे रेल्वे या आंदोलकांवर कठोर कारवाईही करू शकत नसल्याची खंत रेल्वे अधिकारी व्यक्त करतात. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवांमध्ये रिक्षा आणि टॅक्सी या सेवांचाही समावेश केला आहे, पण दर दिवशी ७५ लाख प्रवाशांची वाहतूक करणारी रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने ही सेवा अत्यावश्यक सेवा मानली गेलेली नाही. वास्तविक मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेला हा दर्जा राज्य सरकारने द्यायला हरकत नसल्याचे मत प्रवासी संघटना व्यक्त करत आहेत. तसेच अशा प्रकारे रेल्वे बाह्य़ गोष्टींसाठी रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही प्रवासी संघटनांनी केली आहे. टिटवाळा येथील इंदिरा नगर येथील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी गुरुवारी गेले होते. त्या वेळी येथील रहिवासी आणि अधिकारी यांच्यात मतभेद झाले आणि संतप्त रहिवाशांनी थेट रेल्वे फाटक उघडून रेल्वेमार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतूक बंद पडली. या आंदोलनाचा मोठा फटका रेल्वेच्या वाहतुकीला बसला आणि उपनगरीय रेल्वेच्या १४ सेवा रद्द झाल्या, तर ५०हून अधिक सेवांना दिरंगाईचा फटका बसला. तसेच अनेक लांब पल्ल्यांच्या गाडय़ांची वाहतूकही रखडली.