रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव गाडी सुटण्याच्या २४ तास आधी बदलण्याच्या सुविधेला रेल्वेने नव्याने उजाळा दिला आहे. या सुविधेचा फायदा एकाच कुटुंबातील व्यक्तींना घेता येणार आहे.
रेल्वेच्या आरक्षित तिकिटावर नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीऐवजी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रवास करावयाचा असेल तर त्याला दुसरे आरक्षित तिकीट काढावे लागत होते.
तिकिटात बदल शक्य
पण आता मूळ तिकिटातच बदल करणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या http://www.indianrail.gov.in/change_Name.html या संकेतस्थळावर या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार महत्त्वाच्या स्थानकांवरील मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांना याबाबतचे हक्क देण्यात आले आल्याचे स्पष्ट होते. रेल्वे प्रवास आणखी सोपा आणि सुकर व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून होत असलेल्या विविध प्रयोगांचाच हा एक भाग असल्याचे सांगण्यात येते.

नाव बदलण्यासाठी अटी
*जर प्रवासी सरकारी नोकर असेल आणि तो सरकारी कामानिमित्त प्रवास करीत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पत्र गाडी सुटण्याच्या २४ तास आधी सादर करून मूळ तिकिटामध्ये नाव बदल करता येऊ शकते.
*जर प्रवाशाने गाडी सुटण्याच्या २४ तास आधी माझे आरक्षण माझ्या कुटुंबातील अमूक व्यक्तीच्या नावावर करावे असे लेखी पत्र दिले तर नाव बदल होऊ शकते. पण कुटुंबातील व्यक्ती आरक्षित तिकिटावर नाव असलेल्या व्यक्तीचे वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, नवरा किंवा बायको असायला हवेत.
*जर प्रवासी विद्यार्थी असेल आणि त्या विद्यार्थ्यांऐवजी तो शिकत असलेल्या संस्थेतील दुसऱ्या विद्यार्थ्यांला प्रवास करावयाचा असेल तर संस्थाप्रमुखांचे पत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे गाडी सुटण्याच्या ४८ तास आधी संपर्क साधल्यास नाव बदलता येऊ शकेल.