आजूबाजूला वाईट गोष्ट घडतेय म्हटल्यावर आपल्याला राग आला पाहिजे. तो विझला असेल, तर काही उपयोग नाही, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मनसेच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम झाला.
राज ठाकरे म्हणाले, प्रत्येकजण स्वतःचे घर नीट ठेवतो. मग शहरही आपले घरच असल्याचे समजून ते नीट केले पाहिजे. कोणतीही वाईट गोष्ट घडत असल्याचे दिसल्यावर त्याचा राग आला पाहिजे आणि त्याविरोधात आवाजही उठवला पाहिजे. मी स्वतःदेखील कुठेही जाताना काही वाईट घडत असल्याचे दिसल्यावर तिथल्या नगरसेवकाला किंवा पदाधिकाऱला फोन करतो. सगळ्याच गोष्टी केवळ मत मिळवण्यासाठी करायच्या नसतात, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती मिळवण्याची भूक लागली पाहिजे, असेही ते म्हणाले.