ज्येष्ठ नाटय़निर्माते राजाराम शिंदे यांचे शनिवारी चिपळूण तालुक्यातील पेढांबे या त्यांच्या गावी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते यापूर्वी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच सांगली येथे झालेल्या ६९व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने नाटय़सृष्टीवर शोककळा पसरली असून रविवारी त्यांच्या गावीच त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा मराठी नाटय़ जगात विशेष दबदबा होता. ‘नाटय़मंदार’ या संस्थेचे संस्थापक होते. या नाटय़मंदारने ‘चांदणे शिंपीत जा’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘भोवरा’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘सौजन्याची ऐशी तशी’, ‘ही श्रींची इच्छा’ अशी दर्जेदार नाटके रसिकांना दिली. पत्रकार, नाटय़लेखक, नाटय़अभिनेते, नाटय़निर्माते, दिग्दर्शक, वक्ते आणि सामाजिक व राजकीय कार्यकत्रे अशा अनेक भूमिकांमधून ते वावरले. राजकीय प्रवास १९७८ मध्ये राजाराम शिंदे हे चिपळूण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकत्रे यांच्या अनेक संघटना त्यांनी उभारल्या होत्या. देशातील सर्व भाषांच्या रंगभूमींच्या संशोधनासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा ‘यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल आणि रंगभूमी संशोधन केंद्र’ हा प्रकल्प उभारला आहे. माजी आमदार आणि रंगकर्मी तसेच शिक्षण, नाटय़ आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी कार्यासह कोकणात आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवणाऱ्या स्वर्गीय राजाराम शिंदे यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री