बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बुधवारी बहुचर्चित हिट अँड रन खटल्यात दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. त्यानंतर सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीनही मंजूर झाला असून सलमानचे वकील या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून सलमानला करण्यात आलेली शिक्षा खूपच कडक असल्याची ओरड होत आहे. मात्र, या खटल्यातील महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या रविंद्र पाटीलचा विचार करता सलमान खानची शिक्षा म्हणजे फारच सौम्य असल्याचा मतप्रवाह आता पुढे येताना दिसत आहे. अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा अंगरक्षक म्हणून उपस्थित होता. आता तो या जगात नाही. ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा नैराश्याने आणि क्षयरोगाने बळी घेतला.रविंद्रने दाखल केली होती एफआयआर. याच रविंद्र पाटीलनेच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रविंद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रविंद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.रविंद्रने न्यायालयात दिली होती खरी साक्ष. रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता. रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला. यावेळी तो मद्य प्यायलेला होता. आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.रविंद्रवरचा दबाव वाढला. यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच त्याला नैराश्याने घेरले.रविंद्रला अटकपोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढले होते. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला. त्यामुळे रविंद्रच्या नैराश्यात आणखीनच भर पडली. त्याने मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र. मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रने त्यांचे ऐकले नाही.साक्ष बदलण्यासाठी दबाव. रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.न्यायालयात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास.सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सराईत गुन्हेगारांपासून दूर ठेवण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.भीक मागण्याची वेळ. कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता. त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितले जाते.रविंद्रचे अखेरचे काही क्षण.दारूचं व्यसन. आणि क्षयरोग२०००७ मध्ये तो सेवरी पालिकेच्या रुग्णालयात सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही. आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.न्यायालयाने रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली. रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली. सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात रविंद्रच्या मृत्यूनंतरही त्याची अगोदर नोंदवलेली साक्ष खूप महत्त्वाची ठरली.