राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून सुरू झाली आहे. १६ ऑगस्ट २०१७ पर्यंत १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकुण २६ हजार केंद्रावर अर्ज भरण्यात येत असून त्यात ‘आपले सरकार केंद्र’, ‘नागरिक सुविधा केंद्र’, ‘संग्राम केंद्र’ आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे.

हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. मागच्या आठवड्यापासून जवळपास रोज एक ते सव्वालाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी होत असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यासाठी मोठे आंदोलन करीत शेतकऱ्यांकडून काही दिवसांसाठी बंदही पाळण्यात आला होता. या दरम्यान, काही हिंसक घटनाही घडल्या होत्या. या परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ठराविक निकषांच्या आधारे कर्जमाफी जाहीर केली होती.

[jwplayer wsY6wxg3]