मुलुंडमध्ये जलवाहिनीला खेटून उभ्या राहिलेल्या झोपडय़ांमधील रहिवाशांचे मानखुर्दऐवजी मुलुंडमध्येच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.  जलवाहिनीच्या आसपास १० मीटर पर्यंत वसलेल्या झोपडय़ा हटविण्याची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार मुलुंडमधील सुमारे ३०० झोपडय़ा हटविण्यात येणार असून त्यातील रहिवाशांचे मानखुर्द येथे पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यासाठी लॉटरी काढण्याची तयारी महापालिकेने सुरू केलेली असतानाच रहिवाशांनी मात्र मानखुर्द ऐवजी मुलुंडमध्येच पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. स्थानिक आमदार चरणसिंग सप्रा यांनी रहिवाशांची ही भूमिका मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कानावर घातली. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून  महापालिकेस मिळालेल्या ३०० सदनिका याच परिसरात असून तेथे या लोकांचे पुनर्वसन करण्याची मागणी सप्रा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.