‘भारतीयांकडे कल्पनांचा तोटा नाही, परंतु कल्पना किंवा संशोधनाची भाषा व्यवसायाभिमुख तंत्रज्ञानात किंवा समाजाभिमुखतेत उतरणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुकूल वातावरणाची आपल्याकडे असलेली कमतरता भरून निघाली तर गुणवत्तेचा दर्जा आपोआप उंचावले आणि भारताचे जगातील स्थान उंचावेल,’ अशी अपेक्षा ‘केंद्रीय अणुऊर्जा आयोगा’चे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली. ‘शरद पवार अमृत महोत्सवा’निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘प्रशासन व्यवस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विकासाशी असलेले नाते’ उलगडताना डॉ. काकोडकर बोलत होते. संशोधनाचा विस्तार आणि दर्जा उंचावला की देशाचे ‘सकल राष्ट्रीय उत्पन्न’ (जीडीपी) वाढते. अर्थात हे संशोधन औद्योगिक व व्यावसायिक यश मिळवून देणाऱ्या तंत्रज्ञानात उतरणारे हवे. आपल्याकडे असे तंत्रज्ञानात उतरणारे संशोधन शून्य आहे. संशोधन आणि तंत्रज्ञानातील ही दरी दूर करण्याचा प्रयत्न आपल्या आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांनी करायला हवा. भारतातील सर्वाधिक तरुण ग्रामीण भागात असल्याने तेथेही शिक्षण संस्था, जागतिक दर्जाचे संशोधक, उद्योजक यांच्या एकत्रित सहकार्याने ज्ञान केंद्रांची उभारणी करावी. त्यासाठी ‘सिटी टू व्हिलेज’ अर्थातच ‘सिलेज’ ही संकल्पना त्यांनी मांडली. हे प्रत्यक्षात येण्याकरिता ग्रामीण भागात चांगले रस्ते, मूलभूत संसाधने, कच्चा माल, वीज पोहोचायला हवी. माजी पालिका आयुक्त द. म. सुखथनकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित, माजी पोलीस अधिकारी व्ही. रामचंद्रन, माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी लोक प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रशासन, सुरक्षाविषयक प्रशासन, शहरीकरणाचे व्यवस्थापन, प्रशासनातील पारदर्शकता आणि प्रामाणिकता अशा विविध पैलूंना स्पर्श केला. वृत्त वाहिन्यांवर कारवाईची गरज एखाद्या मोठय़ा प्रकरणात राजकीय दबाव असतो का, या प्रश्नाचे उत्तर देताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सतीश साहनी यांनी केवळ राजकीय नेत्यांचाच नव्हे तर समाजाचाही मोठा दबाव येत असल्याचे मान्य केले. आता तर खळबळजनक घटनेचे वृत्त देताना वृत्त वाहिन्या कित्येकदा आपल्या मर्यादांचे उल्लंघन करतात. अशा वाहिन्यांवर न्यायालयाने कारवाई करायला हवी, असे थेट विधान त्यांनी केले. दररोज सरासरी दोन पोलिसांवर कारवाई भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे, असे प्रवीण दीक्षित यांनी या वेळी सांगितले. राज्यात सरासरी दररोज दोन पोलिसांवर कारवाई होते, असे स्पष्ट केले. मुंबईत गाजत असलेल्या जान्हवी गडकर प्रकरणाचा उल्लेख करून नियम आपल्यासाठी आहेत, त्यामुळे त्यांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. ऑडी हातात आहे म्हणून आपल्याला दुसऱ्यांचा जीव घेण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही. त्यामुळे लाल दिव्याआधीचा पिवळा दिवा लागल्यानंतरच चालकाने थांबले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.