रूग्णालयांमध्ये रूग्णासोबत त्याचे फक्त दोनच नातेवाईक थांबू शकतील, असा नियम करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली. रूग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांकडून पुकारण्यात आलेल्या संपप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र, भविष्यात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यानुसार रूग्णालयात रूग्णांबरोबर केवळ दोनच नातेवाईकांना थांबता येईल, असा नियम तयार करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याशिवाय, न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रूग्णालयांमध्ये ११०० सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्याचेही आदेश दिले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात ५ एप्रिलपर्यंत पाचशे तर १३ एप्रिलपर्यंत उर्वरित सहाशे सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संप मागे घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे तुर्तास तरी डॉक्टरांच्या संपामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबणार आहेत.

https://twitter.com/ANI_news/status/844796192613543936

दरम्यान, आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी कामावर रूजू होण्याची विनंती केली. राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा असे ते म्हणाले. तसेच डॉक्टरी पेशा हा अत्यंत नोबल व्यवसाय असून हा पेशा स्वीकारताना घेतलेली शपथ त्यांनी विसरू नये याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा कोणालाच अधिकार नाही. उपचाराविना कोणी गरिबाचा जीव जाऊ नये याचे भान ठेवून सेवेत परत या सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले.