मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची सूचना; प्रवासी संघटनांचा मात्र कडाडून विरोध
उपनगरीय प्रवासादरम्यान परतीच्या प्रवासासाठी अत्यंत सोयीचे परतीचे तिकीट केवळ सहा तासांसाठीच वैध ठेवण्यात यावे, अशी सूचना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे. सध्या परतीचे तिकीट दुसऱ्या दिवशीही परतीचा प्रवास करण्यासाठी वैध मानले जाते. याचा दुरुपयोग करून रेल्वेला ठकवण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा करत ही सूचना पाठवण्यात आली आहे. मात्र या सूचनेला प्रवासी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.
रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करता येतील, याबाबतच्या सूचना रेल्वे बोर्डाने सर्वच विभागांकडून मागवल्या होत्या. त्यात परतीच्या तिकिटाच्या नियमांत बदल करण्याबाबतही सूचना कराव्यात, असे रेल्वे बोर्डाने सुचवले होते. उपनगरीय प्रवासासाठी परतीच्या तिकिटांची मर्यादा एका दिवसाची म्हणजेच रात्री १२ ते दुसऱ्या रात्री १२ पर्यंतच ठेवावी, असे काही विभागांनी सुचवले होते. मात्र मध्य रेल्वेने त्यापुढे जात परतीचे तिकीट केवळ सहाच तासांसाठी वैध धरले जावे, अशी सूचना मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तसेच यापूर्वी प्रवाशांना तिकिटांसाठीचे पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे परतीचे तिकीट ही सोय प्रवाशांना दिली होती. आता एटीव्हीएम, जेटीबीएस, मोबाइल तिकीटप्रणाली अशा अनेक सुविधांचा वापर करून प्रवासी रांगेविना तिकीट मिळवू शकतात. त्यामुळे आता तिकिटाची वैधता सहा तास ठेवल्यास प्रवाशांना अडचण येणार नाही आणि परतीच्या तिकिटांचा गैरवापर टाळता येईल, असा युक्तिवाद मध्य रेल्वेकडून केला जात आहे.या सूचनेला प्रवासी संघटनांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. रेल्वेने प्रवाशांना वक्तशीर सेवा देण्याकडे लक्ष पुरवण्याची गरज आहे. परतीचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनी आपल्या कामांसाठी एखाद्या ठिकाणी किती वेळ थांबावे, हे रेल्वे ठरवू शकत नाही, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाने स्पष्ट केले.

तिकिटांचा गैरवापर..
उपनगरीय प्रवास जास्तीत जास्त दोन ते अडीच तासांचा असतो. त्यामुळे सहा तासांची वैधता योग्य आहे. त्यानंतर प्रवाशांना त्या ठिकाणाहून आपल्या ठिकाणापर्यंत तिकीट काढता येईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. दर दिवशी मध्य रेल्वेमार्गावर ४० हजारांहून जास्त परतीची तिकिटे काढली जातात. ही तिकिटे परतीच्या प्रवासासाठी दुसऱ्या दिवशीही वैध असल्याने त्याचा गैरवापरही होतो. तसेच आपले परतीचे तिकीट दुसऱ्याला देण्याचे प्रकारही घडतात. ते टाळण्यासाठी हा उपाय उत्तम असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.