बॉलीवूड अभिनेता सलमान खानला ‘हिट अँड रन’ प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्याने बॉलीवूडकरांनी दु:ख व्यक्त केल्यानंतर आता गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी वादग्रस्त विधान केले आहे. फुटपाथवर झोपण्याची फार हौस असेल, तर अशा लोकांनी गावी जावे. तिथे कोणतीही गाडी अंगावर येणार नाही, असे ट्विट अभिजीत यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर, “कुत्रे रस्त्यावर झोपले तर कुत्र्याचंच मरण मरतील. रस्ते हे गरीबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी रस्त्यावर झोपलो नाही.” अशी मुक्ताफळे अभिजीत यांनी उधळली आहेत. अभिजीत यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वांनी सलमानच्या पाठिशी उभे राहायला हवे. रस्ते आणि फूटपाथ हे झोपण्यासाठी नसतात. त्यामुळे यामध्ये चालकाचा काहीही दोष असू शकत नाही, असेही अभिजीत यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सलमानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणावर अखेर बुधवारी सत्र न्यायालयाने निकाल दिला असून सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.