मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा निकाल अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे देणार आहेत. ठीक सकाळी सव्वाअकरा वाजता न्यायालय हा निकाल सुनावणार असल्यामुळे १३ वर्षांपूर्वीच्या या खटल्यात न्यायालय सलमानला दोषी ठरवून शिक्षा सुनावणार की त्याची निर्दोष मुक्तता करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत सलमानला न्यायालयाने दोषी धरले तर त्याला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या नव्या आरोपांतर्गत खटला चालविण्यात आला. सरकारी तसेच बचाव पक्षाने आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर २१ एप्रिल रोजी खटल्याचा निकाल ६ मे रोजी सकाळी ठीक सव्वाअकरा वाजता देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. सलमानविरोधात सरकारी पक्षाने एकूण २७ साक्षीदार तपासले. सचिन कदम नावाच्या एका सुरक्षारक्षकाला फितूर झाल्याचे सरकारी पक्षाने जाहीर केले. सलमानला घटनास्थळी पाहिल्याच्या साक्षीवरून कदम याने घूमजाव केले होते. सलमाननेही आरोपी म्हणून आपला जबाब नोंदवताना ‘त्या’ रात्री आपण नाही तर आपला चालक अशोक सिंह गाडी चालवत असल्याचा खळबळजनक खुलासा करून खटल्याला नवे वळण दिले. अशोक सिंह यानेही बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून अपघात सलमानच्या हातून नव्हे, तर आपल्या हातून तेही गाडीचा टायर फुटल्याने झाल्याचा दावा केला. एवढेच नव्हे, तर अंतिम युक्तिवादाच्या वेळेसही सलमानच्या वतीने धक्कादायक व खटल्याला वळण देणारे दावे करण्यात आले. त्यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचा मृत्यू गाडीखाली चिरडून नाही तर गाडी क्रेनने उचलली जात असताना गाडी पुन्हा पडल्याने झाल्याच्या दाव्याचा त्यात समावेश होता. शिवाय सलमानने गाडीखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो घटनास्थळावरून स्वत: पळून गेला नव्हता, तर त्याला पळून जाण्यास सांगण्यात आल्याचाही दावा केला गेला.