साहित्य विश्वातील मानाचा असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या तिसऱ्याच दिवशी भालचंद्र नेमाडे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. ही वादाची लाटही देशांतर्गत तयार झाली नसून थेट लंडनहून आली आहे. नेमाडेंसारख्या वृद्धाने गुपचुप पुरस्कार स्वीकारून आभार मानावेत. त्यांनी टीका केलेले लेखन त्यांनी स्वत: वाचले आहे की नाही, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे, अशा पद्धतीची ट्विपण्णी सलमान रश्दी यांनी केली. नेमाडे यांनी रश्दी यांच्या लेखनाबद्दल काढलेल्या उद्गारांचे हे उत्तर होते. मात्र या वादामुळे मराठी साहित्यविश्वात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
नेमाडे यांच्यावर सलमान रश्दींची असभ्य टीका  
इंग्रजी भाषा मारक असून भारतात शिक्षण क्षेत्रात इंग्रजी भाषेवर बंदी घातली जावी, असे मत स्वत: इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या नेमाडे यांनी व्यक्त केले होते. त्याच वेळी नेमाडे यांनी सलमान रश्दी आणि व्ही. एस. नायपॉल यांच्या लेखनावरही टीका केली. सलमान रश्दी यांनी थेट ट्विटरच्या माध्यमातून नेमाडे यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर मराठी साहित्य वर्तुळात याचे पडसाद उमटले.

रश्दी यांनी नेमाडे वाचलेत का?
भालचंद्र नेमाडे यांनी निश्चितच सलमान रश्दी वाचले आहेत, मात्र सलमान रश्दी यांना मराठी साहित्याची तोंडओळख असणेही कठीण आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्याही त्यांना ठाऊक असणे शक्य नाही. नेमाडे यांनी रश्दी यांच्या लेखनावर केलेली टीका मूल्यमापनाच्या धर्तीवर असेल. हे मूल्यमापन कदाचित चूकही असेल, मात्र नेमाडे यांच्या साहित्यातील एकही ओळ न वाचता रश्दी यांनी त्यांच्यावर अशी टीका करणे व्यर्थ आहे.
-अशोक शहाणे.

वेळ चुकली!
भालचंद्र नेमाडे किंवा सलमान रश्दी हे दोघेही खूप मोठे लेखक आहेत. नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर होऊन पुरते चार दिवस उलटत नाहीत, तोच हा वाद चालू होणे चूक आहे. या दोघांनीही एकमेकांबद्दल काही मते व्यक्त केली असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र एखाद्या गुणी लेखकाला मोठा सन्मान मिळाला असेल, तर त्याच्या आनंदात व्यत्यय येणारे काही घडावे, हे योग्य नाही. दोघांचीही भूमिका योग्य असेलही, पण ती मांडण्याची वेळ नक्कीच चुकली आहे.
-विजया राजाध्यक्ष

दोघांचीही वक्तव्ये अप्रस्तुतच!
औपचारिक लेखन करताना वापरण्यात येणारे सभ्यतेचे नियम लोक ट्विटरसारखे माध्यम हाताळताना सर्रास मोडतात. हे खरे असले तरी मुळात नेमाडे यांनी रश्दी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य खोडसाळ आहे. रश्दी शालेय वयापासूनच लंडनमध्ये वाढले. त्यांच्यावर भारतीयत्वाचा शिक्का आपण लावला. त्यांनी कोणत्या भाषेत लिहावे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. ते तिकडलेच आहेत, हे आपल्याला कळायला हवे. त्यामुळे नेमाडे यांचे वक्तव्य अत्यंत अप्रस्तुत होते. मात्र, त्याच वेळी सलमान रश्दी यांनी नेमाडे यांना ज्या भाषेत उत्तर दिले, तेदेखील अप्रस्तुतच म्हणावे लागेल.
-शांता गोखले

हा वाद म्हणजे विचारांना खाद्य!
प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र एक वाचक म्हणून मला दोघांपैकी कोणा एकाची बाजू घेण्याऐवजी दोघांचेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे वाटते. राजकीय क्षेत्रात एक बरोबर असेल, तर दुसरा चूक असू शकतो. मात्र साहित्य, सांस्कृतिक, संगीत अशा क्षेत्रांमध्ये नेमके असे करणे अनिवार्य नसते. विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचे साहित्य एकाच वेळी आपल्याला आवडू शकते. रश्दी व नेमाडे यांच्यातील या मतभेदांमधून चूक किंवा बरोबर हे वाचकांनी आपापल्या विचाराने ठरवावे.
-रामदास भटकळ