इंच- इंच जागेला कोटय़वधी रुपयांचे मोल आलेल्या मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर आजही तब्बल २६० हेक्टर जागा शुभ्र मिठागरांनी व्यापलेली आहे. रात्रंदिवस गजबजलेल्या उपनगरांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिठागरांना अजूनही शहराचा गंध लागलेला नाही. स्वतमध्येच मग्न असलेल्या या मिठागरांमध्ये पावसाचे चार महिने वगळता शुभ्र सोन्याची शेती होते. समुद्राचे पाणी अडवण्यापासून ते बाष्पीभवनानंतर उरलेले मीठ गोळा करून पुढच्या प्रक्रियेसाठी कारखान्यांपर्यंत पाठवण्यापर्यंतचे काम एका गतीने सुरू राहते. आता मात्र या गतीला धक्के बसत आहेत. कधीकाळी महात्मा गांधीच्या मुठीतील मिठाने क्रांती घडवली होती. आता पुन्हा एकदा मिठागरे बातम्यांचा विषय होत आहेत. उन्हात झळाळून उठणाऱ्या या मिठागरांचे शहरातील अस्तित्व व भविष्यकाळ धोक्यात आला आहे. जास्तीत जास्त जागेचा बांधकामासाठी उपयोग करण्याच्या प्रयत्नांमध्ये मिठागरे अंशत खुली करण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न होत आहेत. भविष्यकाळ अधांतरी असलेल्या या शुभ्र सोन्याच्या खाणीची विविध रुपे टिपली आहेत छायाचित्रकार निर्मल हरिहरन यांनी.
निर्मल हरिहरन