विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत संघटनात्मक बदल होत असून खासदार संजय राऊत, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, सुभाष देसाई व श्वेता परुळकर यांना प्रवक्तेपदावरुन डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आधीच्या प्रवक्त्यांची वक्तव्ये शिवसेनेला अडचणीची ठरल्याने आणि नवीन नेत्यांना संधी देण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. नीलम गोऱ्हे यांना प्रवक्तेपदी कायम ठेवण्यात आले असून खासदार अरविंद सावंत, आमदार विजय शिवतारे, डॉ. मनीषा कायंदे, अमोल कोल्हे, अरिवद भोसले यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान हे प्रवक्त्यांचे समन्वयक असतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेनुसारच प्रवक्त्यांनी बोलावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे संबंधितांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांचा पराभव होईपर्यंत चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा करून आठ वर्षे अनवाणी चालणाऱ्या अरविंद भोसले यांच्या पक्षनिष्ठेबद्दल त्यांना सोन्याची चप्पल देऊन सन्मानित करण्या पाठोपाठच शिवसेनेचे प्रवक्तेपदही बहाल करण्यात आले आहे.