नेवाळीतील संरक्षण दल व स्थानिक शेतकऱ्यांमधील जमिनीच्या वादावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईजवळ कल्याण येथे शेतकऱ्यांवर काश्मीर खोऱ्यात दंगलखोर अतिरेक्यांवर चालवल्या जाणाऱ्या पॅलेट गनचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणे दुर्देवी असल्याचे सांगत कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा संघर्ष अजून संपला नसल्याची खंत शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील अग्रलेखातून व्यक्त केली आहे. संरक्षण दलाने पाकच्या ताब्यातील जमीन आधी सोडवून घ्यावी. देशाच्या सीमांवर कुंपण नाही पण नेवाळीतील शेतजमिनीवर भिंती उभारण्याचे काम नौदल करत आहे. सीमेवर जवान मरत आहेत व राज्यात किसान मारला जात आहे. शेतकऱ्यांना नाहक मारले जात असल्याचा आरोप करत नेवाळीत जे घडले ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नेवाळीतील वाद हा शेतकरी आणि संरक्षण दलातील असला तरी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारे पोलीस महाराष्ट्र सरकारचे होते, हे सांगत सेनेने अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याकडे बोट केले आहे. ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनी नौदलाच्या ताब्यात दिल्या होत्या. हा करार कायमस्वरूपी नव्हता, युद्धपरिस्थितीसाठी केलेली ती सोय होती. ब्रिटिशांचे राज्य जाऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळत नाही. त्यांना हक्क मिळत नाही. सातबाऱ्यावर त्यांचे नाव येत नसल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या तीन पिढय़ा संघर्ष करत आहेत. शेतकरी लढण्यासाठी उभा राहिला तर त्याच्यावर गोळ्या झाडण्याचे पाप केले जात आहे. शांतपणे जमिनीचा हक्क मागणारा शेतकरी हिंसक का झाला याचे उत्तर गृहखात्यास द्यावे लागेल, असा जाब त्यांनी विचारला. ज्या कामासाठी व प्रकलपासाठी जमिनी ताब्यात घेतल्या त्या योजना त्या जमिनीवर पूर्ण झाल्या काय, असा सवाल विचारत प्रकल्प झाले नसतील तर जमिनी परत मिळायला हवेत अशी मागणी केली. राज्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांची वेदना नेवाळीच्या रस्त्यावर ज्वालामुखीसारखी बाहेर पडली आहे. कोयना प्रकल्पापासून समृद्धी प्रकल्पापर्यंत शेवटी शेतकऱ्यांचेच बळी गेल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.