केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचेच सरकार येणार या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला हादरा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला एकही अपेक्षित अधिक जागा न देणारा जागावाटपाचा अंतिम प्रस्ताव रविवारी जाहीर केला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून दिवसभर बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र कुणीच मागे हटण्यास तयार नसल्याने तोडगा निघणे कठीण झाले. त्यामुळे देशाच्या राजकारणात २५ वर्षे हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर टिकलेली युती वेळप्रसंगी तोडण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी रात्री उशिरा हिरवा कंदील दाखविल्याचे समजते.
उल्लू बनाविंग..
देशाच्या राजकारणात २५ वर्षे दीर्घकाळ टिकलेली युती वेळप्रसंगी तोडण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी अखेर हिरवा कंदील दाखविला. भाजपचा निम्म्या जागांचा आग्रह शिवसेनेने धुडकावून लावल्याने नाईलाजाने युती तोडण्यासाठी भाजपकडून पावले टाकली जाणार आहेत. शिवसेनेला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी ओम माथूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतील आणि शिवसेना न झुकल्यास युती तोडण्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, असे भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची आणि संसदीय मंडळाची बैठक रविवारी रात्री उशिरा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला  युतीमध्ये निर्माण झालेले पेचप्रसंग आणि कटुता हे आता हाताबाहेर गेले असून निवडणुकीसाठी युती टिकून राहील, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही.
भाजपच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचे त्यांना सांगितले. पण निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का लावला, अशी विचारणा करीत मोदी यांनी राज्यातील नेत्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. शिवसेनेने रविवारी दिलेल्या प्रस्तावावर भाजपची भूमिका सांगून आपल्याला हव्या त्या जागा न मिळाल्यास युती तोडण्याचा निर्वाणीचा इशारा शिवसेनेला द्यावा, अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत.
भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार
भाजप लढवित असलेल्या जागांपैकी सुमारे १०० उमेदवारांच्या यादीला केंद्रीय संसदीय मंडळाने मान्यता दिली आहे. युतीबाबतच्या चर्चेचा कल पाहून ही यादी भाजप सोमवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.
BLOG: …खग भेणे वेगळाले पळाले!
शिवसेनेने तयार केलेल्या जागावाटपाच्या अंतिम प्रस्तावात भाजपला केवळ ११९ जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांपैकी नऊ जागा शिवसेना देईल त्या भाजपला घ्याव्या लागतील, असे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.
लोकसभेच्या यशामुळे घटकपक्षांच्या जागावाटपानंतर निम्म्या जागांसाठी भाजपने आक्रमक भूमिका स्वीकारली होती. सन्मान राखला गेला नाही, तर युती तोडण्याच्या धमक्या भाजपने दिल्या आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही भाजप नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात आणण्याचे आवाहन वारंवार केले.
मात्र भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षांना वेसण घालत राज्यात शिवसेना हाच मोठा भाऊ राहील, अशा पद्धतीने जागावाटपाचे नवीन सूत्र प्रदेश कार्यकारिणीत ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे जाहीर केले.
शिवसेना १४०, भाजप १३० आणि घटकपक्षांना १८ जागा, असा प्रस्ताव भाजपने शनिवारच्या बैठकीत ठेवला होता. मात्र तो धुडकावून लावत ठाकरे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत १५१ जागा लढविणार आणि हा अंतिम प्रस्ताव असल्याचे जाहीर केले.
युतीचे भवितव्य आता घटस्थापनेच्या मुहूर्तावर?
ठाकरेंची राजकीय चलाखी
*शिवसेनेने गेल्या वेळी १६९ जागा लढविल्या होत्या आणि या वेळी आपल्या १८ जागा घटकपक्षांना देत १५१ जागा लढण्याचे जाहीर केले. आपल्या जागांचे नुकसान स्वीकारले, तरी त्यातील एकही जागा भाजपला जाणार नाही, याची दक्षता घेत घटकपक्षांना आपल्यासोबत ठेवण्याची चलाखी उद्धव यांनी दाखविली.
*जागावाटपाचे सूत्र जाहीर करताना भाजप व शिवसेना घटकपक्षांना प्रत्येकी नऊ जागा देईल, असे सांगण्यात आले.
*त्यातून कमी होणाऱ्या भाजपच्या नऊ जागांची भरपाई शिवसेनेने करण्याची तयारी दाखवत आपण काही देत असल्याचे दाखविले खरे, मात्र या नऊ ‘पडेल’ जागाही शिवसेना आपल्या पसंतीने भाजपला देईल, हेही ठाकरे यांनी परखडपणे सांगितले.

“राज्यातील जनता महायुतीला सत्ता देण्याच्या तयारीत असताना भाजपने कर्मदरिद्रीपणा दाखवू नये. आम्हाला कस्पटासमान लेखाल, तर शिवसेनेचे वाघ तयारच आहेत.”  
उद्धव ठाकरे</strong>