राज्यातील सध्याची राजकीय स्थिती दीर्घकालीन स्थिरतेला मदत देणारी नसल्यामुळे पुढील सहा महिन्यांत पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांच्या विधानाला आव्हान दिले आहे. शिवसेना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होऊ देणार नसल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
पवारांनी राज्यात पुन्हा निवडणुकांचे संकेत दिले असले तरी, सरकारच्या चाव्या शिवसेनेकडेच आहेत आणि आम्ही त्यावर विचार करू. राज्यात पुन्हा निवडणुका होणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असंही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर होऊ शकतं हा राष्ट्रवादीचा गैरसमज असून आधी शरद पवार यांनी आपलं याआधीचं विधान तपासून पहावं. याआधी पवारांनीच राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी पाठिंबा देत असल्याचं सांगितलं होतं. असंही राऊत पुढे म्हणाले.