महाराष्ट्रातील सरकार स्थिर ठेवण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावर महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शरसंधान साधले. शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी झाली आहे, त्यांना केवळ सरकार स्थिर करावयाचे असेल तर मंत्रिमंडळात सहभागी न होताही ते करता येते, असा टोला खडसे यांनी लगावला. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विधानाची त्यांनी खिल्ली उडविली. कदम यांचे विधान फारसे कोणी गांभीर्याने घेत नसल्याचे ते म्हणाले.
कृषी व पणन विभाग, श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी खडसे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी टोलेबाजी केली.