महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून निर्माण झालेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादातून गेले दोन दिवस एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र, बुधवारी शिवसैनिकांनी या वादात उडी घेत एकनाथ खडसेंना मोबाईल फोन भेट दिला. मुंबईतील सांताक्रुझ पोस्ट कार्यालयातून जितेंद्र जनावळे या शिवसैनिकाने मायक्रोमॅक्स कंपनीचा हा मोबाईल फोन खडसेंना पाठवला आहे. एकनाथ खडसेंनी शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केल्याच्या निषेधार्थ आपण हे पाऊल उचलल्याचे जनावळे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांतच हा मोबाईल फोन खडसेंपर्यंत योग्य तो संदेश पोहचवेल अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, मग वीजेचं बिल का भरत नाहीत? असा सवाल उपस्थित केला होता.