शिवसेना-भाजपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली आहे. 'राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये युती करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असणार नाही,' असे दानवे आणि राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 'शिवसेना आणि भाजपची युती व्हावी ही मतदारांची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही राज्य पातळीवर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीसंबंधी दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी स्थानिक नेत्यांना युती करण्याच्या सूचना दिल्या आहेत,' असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे. 'भाजप आणि शिवसेनेत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये युती केली जाईल. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. जर अडचण आलीच, तर तो प्रश्न राज्य पातळीवर सोडवला जाईल. या युतीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आनंद झाला,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना-भाजपकडून राज्यभरातील नगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवल्या जातील, हे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुंबई, ठाण्यातील महानगरपालिका निवडणुकीबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. गुरुवारी दिवसभर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल. या जागावाटपात जिल्हा प्रमुखांना अधिकार देण्यात येतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युतीसाठी गुरुवारी दिवसभर सकारात्मक हालचाली सुरू होत्या. युतीची चाचपणी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठक झाली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रावसाहेब दानवे यांच्यात फोनवरूनदेखील चर्चा झाली. गुरूवारी सकाळी खासदार विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर राऊत हे महापौर बंगल्यावर रवाना झाले. त्यांनी झालेल्या चर्चेचा वृत्तांत फोनवरून उद्धव ठाकरे यांना दिला होता. भाजपने शिवसेनेशी युती करण्यासाठी सुरूवातीपासून सकारात्मकता दाखवली होती. शिवसेनेने मात्र स्वतंत्र लढण्याचा विचार बोलून दाखवला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत होते. यामुळे युतीमधील तणावात आणखीनच वाढ झाली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर टीका करू नये असे आवाहन केले होते.