प्रभादेवी, इंदू मिल परिसरात छोटी उदंचन केंद्रे; अनेक उपाय पालिकेच्या विचाराधीन ब्रिटानिया उदंचन केंद्राचा उपाय निष्प्रभ ठरल्याने हिंदमाताच्या ‘पाणीभरती’च्या प्रश्नावर तोडगा म्हणून प्रभादेवी आणि दादरच्या इंदू मिल परिसरात छोटी उदंचन केंद्रे उभारण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. याशिवाय रेल्वेच्या सहकार्याने हिंदमाता परिसरात साचणारे पाणी क्लिव्हलॅण्ड बंदर उदंचन केंद्राकडे वळवणे, उंचावर असलेल्या शिवडी, वडाळा, परळ आणि आसपासच्या परिसरातून वाहून येणारे पाणी स्वतंत्र पर्जन्य जलवाहिनीद्वारे वळवणे, ब्रिटिशकालीन गटारांचे विस्तारीकरण करणे असे काही उपायही पालिकेच्या विचाराधीन आहेत. या उपाययोजना केल्यानंतर हिंदमाता परिसराला काही अंशी दिलासा मिळेल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. २९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीत हिंदमाता परिसर जलमय झाला. इतकेच नव्हे तर जूनपासून आतापर्यंत १४ वेळा हिंदमाता परिसर जलमय झाला. ब्रिटानिया उदंचन केंद्र कार्यान्वित केल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने पालिकेने पुन्हा हिंदमाता परिसराला जलमुक्ती देण्यासाठी ठोस उपायांचा शोध सुरू केला असून त्याचा एक अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत. ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पामध्ये हिंदमाता जलमुक्त होण्यासाठी ब्रिटानिया उदंचन केंद्र आणि दादर येथे लहान उदंचन केंद्र उभारण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार सुरुवातीला ब्रिटानिया उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर हिंदमाता परिसरात पाणी साचते का याचा आढावा घेऊन दादर येथे उदंचन केंद्र उभारण्याबाबत निर्णय घेण्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे एकमत झाले. ब्रिटानिया उदंचन केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या वर्षी पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी साचले. त्यानंतर यंदा मुसळधार पाऊस पडल्यानंतर १४ वेळा हिंदमाता परिसरात पाणी साचून रहिवासी, पादचारी आणि वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे ‘एफ-दक्षिण’ विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा हिंदमाता, एल्फिन्स्टन परिसराचा अभ्यास केला. या अधिकाऱ्यांनी आपल्या अभ्यास अहवालामध्ये काही उपाययोजना सुचविल्या असून हा अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात आला आहे. हिंदमाता परिसराला लवकरात लवकर जलमुक्ती देता यावी म्हणून या उपाययोजनांवर प्रशासन पातळीवर विचार सुरू झाला आहे. नेमकी अडचण काय? शिवडी, वडाळा, परळ आणि आसपासच्या परिसरातील उतारावून वाहून येणारे पाणी हिंदमाता आणि एल्फिन्स्टन परिसरात साचते आणि त्याचा निचरा होण्यास विलंब लागतो. हे पाणी ब्रिटानिया उदंचन केंद्र आणि मलनिस्सारण खात्याच्या माटुंगा येथील उदंचन केंद्राच्या दिशेने वाहून जाते. मात्र ब्रिटानिया उदंचन केंद्रापासून हिंदमाता परिसर तब्बल ६.५ कि.मी. दूर असून भायखळा, लालबाग परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर हिंदमाता परिसरातील पाण्याला वाट मोकळी मिळते. परिणामी, ब्रिटानिया उदंचन केंद्रापासून शेवटच्या टप्प्यात असलेल्या हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता प्रभादेवी येथील राऊळ उद्यानात अथवा दादरमधील इंदू मिलच्या आसपासच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून तेथे एखादे छोटे उदंचन केंद्र उभारण्याची शिफारस अभ्यास अहवालात करण्यात आली आहे. या छोटय़ा उदंचन केंद्रांमुळे बशीचा आकार तयार झालेल्या हिंदमाता परिसरातील साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा करता येऊ शकेल, असे अहवालात नमूद केले.