प्रवासी संख्येत घट होण्याची भीती प्रवासी संख्येत घट होत असल्यामुळे तोटय़ात सुरू असलेल्या एसटीला जीवनदान देण्याऐवजी प्रवासी वापरत असलेल्या अनेक योजना बंद करण्याचा धडाका प्रशासनाने लावला आहे. यात २००३ पासून प्रवाशांच्या सुविधेसाठी वार्षकि २०० रुपये भरून सवलत कार्डाची योजना सुरू होती. या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. या योजनेतून एसटीला वार्षकि दोन ते तीन कोटी रुपयांचा महसूल मिळत होता; परंतु महामंडळाने ही सवलत योजना बंद केल्याने प्रवासी संख्येत आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेमक्या या स्थितीत प्रवाशांना आपल्या सेवेकडे आकर्षति करण्यासाठी नवनव्या सुविधा देणे आवश्यक असतानाच सुविधा कार्डाची योजना बंद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वार्षकि सवलत कार्डधारकांना साध्या बसच्या प्रवासात १० टक्के इतकी सवलत मिळत होती. यामुळे रेल्वेचे तुलनेने कमी किमतीतील तिकीट, खासगी बसवाहतूकदारांकडून सुटीचा हंगाम वगळता इतर वेळी आकारले जाणारे कमी तिकीट, अवैध वाहतुकीतील स्वस्त दर अशा साऱ्याच घटकांच्या अनुषंगाने वार्षकि सवलत कार्ड प्रवाशांना उपयुक्त ठरत होते; परंतु महामंडळाने अचानक ही सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने महामंडळास मिळणारा महसूल बंद होणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासी संख्येवरही परिणाम होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळातील प्रति बस सरासरी प्रवासी संख्या ५४ पर्यंत घसरली आहे. उत्पन्न आणि महसुलाची सरासरी गाठण्यासाठी प्रवासी संख्या प्रति बस ७५ इतकी असणे अपेक्षित आहे. परंतु अवैध वाहतूक, खासगी बसवाहतूकदारांसह विविध कारणांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. अशा वेळी प्रशासनाने हा निर्णय घेणे कितपत योग्य आहे, अशी टीका होऊ लागली आहे.