गेले अनेक दिवस घोळ घालून अखेर राज्य सरकारने शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना ७ टक्के महागाई भत्त्यात वाढ देण्याचा  निर्णय घेतला. परंतु त्याची अंमलबजावणी चालू महिन्यापासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे, त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये काहीशी नाराजी आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १ जुलै २०२ पासून ७ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला. हा भत्ता जशाच्या तसा राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना द्यावा, यासाठी गेले महिनाभर आंदोलने व चर्चा सुरू होती. अर्थमंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नावर सर्व संबंधित संघटनांच्या नेत्यांशी तीन-चारवेळा चर्चा केली. मंगळवारी झालेल्या बैठकीत वाढीव महागाई भत्ता देण्यास सरकारची तयारी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज बुधवारी १ नोव्हेंबरपासून ७ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील चार महिन्यांचा भत्ता मिळणार की नाही, याबद्दल अद्याप काही स्पष्ट झाले नसले तरी दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्यात वाढ करुन सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. राज्यातील सुमारे १६ लाख कर्मचारी-अधिकाऱ्यांना व चार लाख निवृत्तीवेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.